मुंबई : राज्यसरकारने वारंवार आवाहन करूनही आपल्या मागण्यांवर ठाम राहून संप सुरु ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात झाली आहे. एसटी महामंडळाने तब्बल ५५ हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून तितक्याच कामगारांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिवहन विभागाने या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली. मात्र विलीनीकरणाच्या मुद्यावर हे कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळून एसटी वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामंडळ आक्रमक झाले आहे. 


एसटी महामंडळाने एसटीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. तसेच, जाहिराती प्रसिद्ध करून कंत्राटी चालकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. वय ६२ वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक आहे, करार पद्धतीवर नेमणूक होणाऱ्या चालकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे.


सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले इच्छुक चालक सेवानिवृत्त झालेल्या विभागात करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकतील. मात्र, ते सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची नोंद नसणे, शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केले नसणे अशा अटी महामंडळाने घातल्या आहेत. 


त्याचबरोबर महामंडळाने मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून करार पद्धतीने चालक भरती करून घेण्यासाठी अर्ज मागविले आहेत. या चालकांना अवजड वाहन चालवण्याचा किमान एक वर्षाचा अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव, वाहन चालवण्याचा परवाना व पीएसव्ही बॅच असणे आवश्यक असल्याची अट टाकली आहे. 


दरम्यान,  कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना संप काळातील पगार मिळणार नसल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.