मुंबई : पावसाळ्याच्या सुरूवातीला तब्येत बिघडण्याचं प्रमाण वाढतं, म्हणून पावसाळ्यात आहार कसा असावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत  काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रीष्म ऋतूमधून वर्षा ऋतूत आल्याने शरीरात वातदोष वाढतो, या दरम्यान पचनक्रिया मंदावल्याने अधिक अडचणीचं होतं.


पावसाळा आणि दुषित पाणी


पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर येतो, ते जलसाठ्यात येतं, तेच पिण्याच्या संपर्कात येतं, यासोबत पहिल्या पावसात अशुद्ध पाण्याचं प्रमाण अधिक असतं, म्हणून हगवण, उलट्या, जुलाब, पोट बिघडणे, गॅस धरणे , आव पडणे यासारख्या तक्रारी वाढतात. याला 'नवं पाणी बाधलं' असंही म्हटलं जातं.


फिल्टर किंवा विश्वासार्ह मिनरल वॉटर नसल्यास पाणी गरम करूनच प्या...


पावसाळ्यात आहार कसा असावा, थोडक्यात...


लाह्या, भाकरी, चपाती, दूधभात, पिठले चालेल.


नुसत्या पावापेक्षा त्याचा टोस्ट बनवून खा. 


पावसाळ्यात पक्वान्ने टाळावीत. 


स्वयंपाकाचे पदार्थ तेल-तुपाने मसाल्याचे चमचमीत बनवलेत तरी चालेल. 


हिंग, मिरी, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदीना हे सर्व घटक अन्नपचनाला मदत करतात, ते वापरा.


मोजकेच तेल, वात कमी करणारे आहे, तर साजूक तूप, वात आणि पित्त दोन्ही कमी करणारं आहे. 


कारण पावसाळ्यात वात आणि पित्त दोन्ही वाढलेले असते, म्हणून जमल्यास अन्नपदार्थ साजूक तुपात बनवावेत. वनस्पती तुपात नव्हे. 


तेलातील विशिष्ट घटकामुळे पित्त वाढते आणि वर्षां ऋतूत पित्तसंचयाचा ऋतू! म्हणून तेलात तळलेले पदार्थ या दिवसात खाऊ नयेत. 


पावसाळ्याच्या सुरुवातीला गरम भजी, बटाटेवडे खावेसे वाटले तरी, प्रमाणात खावेत. 


या ऋतूत दही कमी खावे. दह्यमुळे शरीरातील अग्नी मंदावतो, पण ताक याच्या विरुद्ध गुणधर्माचे आहे. या दिवसात ताक प्या. 


सुंठ, आलं व सैंधव मीठ घातलेले ताक आणि दह्यच्या वरचे पाणी नियमित प्या. 


पालेभाज्यांमध्ये माठाची भाजी योग्य. शिवाय दुधी, दोडका, पडवळ, भेंडी, अशा वातशामक भाज्या अधिक प्रमाणात घ्या.


 जुने धान्य पचावयास हलके असते. त्यामुळे या ऋतूत जुने गहू, जुने तांदूळ, जुनी धान्ये जसे मूग, मटकी, चवळी वापरावीत. आवळा, लिंबू यांची सरबते उत्तम. 


ओवा, हळद, मिरी, सुंठ यांची पावडर करून भाकरी, चपातीत वापरल्यास उत्तम. 


मांसाहारी व्यक्तीने मांस खाण्यापेक्षा त्याचे सूप करून प्यावे. यातही सुंठ, मिरी, पुदिनाचा सढळ हाताने वापर करावा.