उन्नाव : लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उन्नाव येथे घडली. या घटनेमुळे दोन्ही घरांतील वातावरण तणावाचे बनले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवधेश सिंह यांच्या मुलगा अभिषेक उर्फ पंकजचा विवाह चार फेब्रुवारी रोजी बिघापूर येथील अकवाबादमधील अभिमन्यू सिंह यांची कन्य रागिनी हिच्याशी झाला होता. पाच फेब्रुवारीला रागिनी-पंकजच्या लग्नाची वरात अकवाबादला पोहोचली आणि रात्री उशिरा ते घरी परतले. 


रात्री जेवण झाल्यानंतर सर्व झोपण्यासाठी आपापल्या खोलीत निघून गेले. शनिवारी सकाळी कुटुंबासोबत रागिनीने नाश्ताही केला. त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास ती आपल्या खोलीत निघून गेली. यावेळी नवरा बाहेर गेल्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्या केली. 


दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तिच्या सासूने तिला हाक मारली. दरवाजाही ठोठावला. मात्र दरवाजा आतून बंद होता. वारंवार हाक मारुनही दरवाजा उघडत नसल्याने खोलीच्या काचा फोडून नवरा अभिषेक आता आला. मात्र खोलीत पोहोचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 


रागिनीने गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. दरम्यान, या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.