नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये सरासरी ४  महिलांवर बलात्कार आणि ९ महिलांचा विनयभंग होत होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी तयार केलेल्या अहवालातून उघड झाली आहे. महिला अत्याचारासंबंधी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ही माहिती २०१२ ते २०१५ या  दरम्यानची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अहवालानुसार, २०१२ ते २०१५ या चार वर्षांच्या काळात बलात्काराच्या घटनांची संख्या तिपटीने वाढली.  २०१२ मध्ये दिल्लीमध्ये बलात्काराच्या ७०६ घटनांची नोंद झाली होती. हीच संख्या २०१५ मध्ये २१९९ इतकी झाली होती.


एवढेच नाही, तर २००१ च्या तुलनेत ही संख्या पंधरा पटींनी वाढली आहे. महिलांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग अशा घटनांची संख्या २०१२ मध्ये ७२७ होती. २०१५ मध्ये ती वाढून ५ हजार ३६७ इतकी झाली आहे. 


नवी दिल्लीतील अनेक महिला त्यांच्या घरातही सुरक्षित नसल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे. हुंड्यासाठी छळ होणे, पती आणि सासरच्या इतर मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास होण्याच्या घटनांचीही संख्या वाढत आहे. या चार वर्षांच्या काळात ६८१ महिला हुंडाबळी ठरल्या आहेत.