लखनऊ :  नोटांच्या बंदीमुळे विरोधकांनी हल्ला बोल केला आहे. काल राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर आज बसपा अध्यक्षा मायावती आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही नोट बंदीप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरीब लोकांना अडचणीत आणण्यासाठीच केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा एका रात्रीतून बंद केल्या आहेत, अशी टीका मुलायम यांनी केली आहे.


केंद्र सरकारने ५०० आणि १ हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. नोटा बाद करण्याचा निर्णय आणखी सात दिवस पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी मुलायम यांनी एका पत्रकार परिषदेत केली.


 भाजपला केवळ निवडणूक दिसत आहे. देशात काय सुरू आहे हे दिसत नाही. सर्वसामान्य लोकांच्या काय अडचणी आहेत हे दिसत नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेसमोर खूप अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कमीत कमी एक आठवडा या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी मुलायमसिंह यादव यांनी केली.


देशातील असंख्य महिला नवऱ्याला न सांगता संसारासाठी तसेच पुढील भविष्यासाठी पै-पै जमा करत असतात. पै-पै साठवलेली रक्कम सुरक्षित राहावी यासाठी केंद्र सरकारने महिलांना बॅंकेत ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम भरण्यास सूट द्यावी, अशी मागणी मुलायम यांनी केली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. स्वस्त झालेले सोने ४५ हजारापर्यंत पोहोचले आहे. चांदीही महागली आहे. अनेकांचे ऑपरेशन रखडले आहे.


अनेकांना औषधं मिळणे कठिण झाले आहे, असा आरोप मुलायम यांनी केला. समाजवादी पार्टीने काळ्यापैशांविरोधात आधीपासूनच लढाई लढली असून निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर होऊ नये ही सपाची भूमिका असल्याचेही मुलायम यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, नागरिकांना अडीच लाखांपर्यंतची रक्कम बॅंकेत जमा करता येणार आहे. अडीच लाखांच्या पुढे असलेल्या रक्कमेवर आयकर विभागाची करडी नजर असणार आहे.