तामिळनाडू : राजकीय अस्थिरतेवर येत्या काही दिवसांत फैसला लागण्याची शक्यता आहे. विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून कोणाच्या बाजूनं किती आमदार आहेत, याचा कौल घेण्याचा सल्ला देशाचे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना दिला आहे.


येत्या आठवड्याभरात राव विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावू शकतात. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांना पक्षातून पाठिंबा वाढत असल्याचं चित्र आहे. आणखी काही आमदार आणि खासदारांनी त्यांना पाठिंबा देऊ केला असला, तरी शशिकलांशी टक्कर देण्याइतपत हे बहुमत वाढलेलं नसल्याचंच दिसतंय. त्यामुळे प्रत्यक्षात फ्लोअर टेस्ट झाली, तर त्यात शशिकलांचा विजय होऊ शकतो. दुसरीकडे शशिकलांनीही आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पनीरसेल्वम यांच्यावर DMKच्या तालावर नाचत असल्याचा आरोप केलाय.