नवी दिल्ली : खासदार रवींद्र गायकवाडांवर विमान प्रवासाची घातलेल्या बंदी विरोधात हक्काभंगाच्या प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थेट मंत्र्यांशीच चर्चा करून याबाबत तोडगा काढण्याची सूचना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केलीय. शिवसेना खासदारांनी गायकवाडांवरील विमान प्रवासबंदी हटवण्याची मागणी शिवसेना खासदारांनी केली. मात्र, हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी याबाबत ठोस आश्वासन न देता सुरक्षेबाबत तड़जोड केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं गायकवाड प्रकरणावर तिढा कायम आहे.


लोकसभेत काय घडलं...


शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी एअर इंडिया विरूद्ध लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. 'एअर इंडीयाने खासदारावर गुन्हा दाखल केला... पण, सर्वच विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घालणं चुकीचं आहे... संविधानाप्रमाणे नागरिकांना कुठेही प्रवास करता येऊ शकतो... एअर इंडियाची ही बंदी म्हणजे गायकवाड यांना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं आहे', असं आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत म्हटलं. 


'माझी अपेक्षा आहे की, सर्व खासदार सहकार्य करतील. अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावे... या प्रकरणाची हवाईउड्डाण मंत्र्यांनी दखल घ्यायला हवी... असं म्हणत विमान कंपन्यांची बंदी उठवण्याची मागणी अडसूळ यांनी लोकसभेत केली.  


यावर, खासदार हेसुद्धा प्रवासी आहेत... खासदार म्हणून भेदभाव करू शकत नाही... कोणत्याही प्रवाशाला बंदी घालता येत नाही... तसंच सुरक्षेसंदर्भात तडजोड करता येणार नाही, असं उत्तर हवाई उड्डाण मंत्र्यांनी दिलं. 


दरम्यान, खासदार रविंद्र गायकवाड मारहाण प्रकरणातील समोर आलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये गायकवाडांना एअर इंडिया अधिकाऱ्यानं धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचं उघडपणे दिसतंय.