नवी दिल्ली :  नोटाबंदीनंतर देशात अनेकजण कॅशलेस व्यवहाराकडे वळलेत. पेटीएम या मोबाईल वॉलेटनंतर आता नागरिक यूपीआयला पसंती देऊ लागले आहेत. हे यूपीआय म्हणजे नक्की काय आहे आणि त्याला का पसंती दिली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोक जबरदस्तीने का होईना आता कॅशलेस व्यवहाराकडे वळू लागलेत. 


कॅशलेस व्यवहारासाठी सध्या बाजारात मोबाईल वॉलेट, 
Neft (National Electronic Funds Transfer), 
Rtgs (Real Time Gross Settlement), 
Imps (immediate payment service) 
Upi (Unified Payment Interfac) 
असे पर्याय उपलब्ध आहेत. 


यातला यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफॅक हा सर्वात सोपा आणि कमी खर्चिक पर्याय असल्यानं तो चांगलाच लोकप्रिय होत आहे. यू पी आय वापरल्यास 5 रुपयांच्या आसपास सेवाशुल्क आकाराल जातं. त्याउलट पेटीएम सारख्या मोबईल वॉलेटच्या वापरावर काही टक्के सेवाशुल्क आकारला जातो. 


या खेरीज यूपीआय ला मल्टिपल बँक अकाऊंट तुम्ही जोडू शकता. विशेष म्हणजे या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या दोघांपैकी एकाकडे यूपीआय नसलं, तरीही काही फरक पडत नाही. एकावेळी तुम्ही 10 हजार रुपयांचा व्यवहार करू शकता. 


यूपीआय वापरण्याला सोपा असल्यानं मोबाईल वॉलेटसारख्या इतर पर्यायांचं मार्केट तो खाऊन टाकेल असं मत तज्ज्ञ व्यक्त करताहेत. 


यूपीआय प्रणाली हे बँकांचंच असल्यानं मोबाईल वॉलेटच्या तुलनेत हा व्यवहार अधिक सुरक्षित ठरतो. दरम्यान काही महिने आधी हा पर्याय सरकारनं उपलब्ध केला असता, तर अधिक चांगलं झालं असतं, असंही जाणकारांचं म्हणणं आहे. 


यूपीआय प्रणाली मोठ्या शहरांमध्ये सध्या वापरली जात असून, खेडेगावांत आणि तळागाळात हा पर्याय लोकप्रिय करण्याचं आता आव्हान आहे.