नवी दिल्ली: अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे पैसे परत न करता विजय मल्ल्या परदेशामध्ये निघून गेले. यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपनंच विजय मल्ल्यांना पळवलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्ल्या 9 हजार कोटी बुडवून परदेशात गेलेच कसे असा सवाल अर्थमंत्री अरुण जेटलींना विचारला, पण त्याला उत्तर न देता जेटलींनी लांबलचक भाषण केलं, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला आहे.


मोदी परदेशातला काळा पैसा भारतात आणण्याची भाषा करतात, पण मल्ल्या देशाचे पैसे बुडवून गेले कसे असा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.


दरम्यान काँग्रेसनं केलेल्या या आरोपांवर भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. विजय मल्ल्यांना यूपीएच्या काळामध्ये कर्ज देण्यात आल्याचं अरुण जेटली म्हणाले आहेत. तसंच बोफोर्स घोटाळ्यामधल्या ओटाव्हियो क्वात्रोचीला पळून जायला कोणी मदत केली असा सवालही जेटलींनी राहुल गांधींना विचारला आहे.