मुंबई :  झी युवा वाहिनीला आणि याआधी प्रदर्शित झालेल्या ‘बन मस्का आणि ‘लव्ह लग्न लोचा या मालिकांच्या शीर्षक गीतांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांनी या दोन्ही शीर्षक गीतांना त्यांच्या पसंतीची मोहर लावली. झी युवा वाहिनीने त्यांच्या ‘फ्रेशर्स आणि इथेच टाका तंबू या दोन नव्या मालिकांचे शीर्षक गीत फेसबुक आणि ट्वीटर या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित केले असून या अफलातून आणि दमदार संगीताला प्रेक्षकांची उत्तम दाद मिळाली आहे.  फ्रेशर्स ह्या मालिकेमध्ये आजची तरुण पिढी, कॉलेजमधील फ्रेशर्सची अतरंगी यारी, त्यांच्या कॅम्पसमधली स्टोरीज झी युवा एका नव्या ढंगात घेऊन येणार असून, ‘इथेच टाका तंबू’ हि मालिका प्रेक्षकांसाठी विनोदाची पर्वणी घेऊन येणार आहे. फ्रेशर्स मालिकेच्या शीर्षक गीताला एका आठवड्यात तब्बल तीन लाख दहा हजार पेक्षा जास्त लोकांनी फेसबुक आणि ट्वीटर बघून झी युवावरील सर्वाधिक लोकप्रिय गाणं बनविले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


‘फ्रेशर्स’ या मालिकेच्या शीर्षक गीताचे संगीत दिग्दर्शन लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अमित राज यांनी केले आहे. वलय मुळगुंद यांनी हे गीत लिहिले असून अमित राज, आरती केळकर, हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी हे शीर्षक गीत गायले आहे. फ्रेशर्स मालिकेतील मनवा राजे (रश्मी अनपट), परी देशमुख (अमृता देशमुख), रेणुका भिलारे (रसिका वेंगुर्लेकर), सायली बानकर (मिताली मयेकर), नीरव देसाई (सिध्दार्थ खिरीड), सम्राट पाटिल (शुभांकर तावडे), धवल मिठबावकर (ओंकार राउत) या सात मित्रांवर हे गाणे चित्रित केले आहे. कॉलेजची मजा – मस्ती, मैत्रीचं निखळ नातं, हळूहळू उमलत असणारे प्रेम, तरुण मनाचं – त्यांच्या स्वप्नाचं, आशा-आकांक्षा यांच चित्रण या गाण्याच्या दिग्दर्शनातून आणि शब्दामधुन टिपण्याचा केलेला अचूक प्रयत्न प्रेक्षकांना आवडला हे गाण्याला मिळालेल्या प्रतिसादातून कळतं. शीर्षक गीतामध्ये पहायला मिळणारी दोस्ती – यारी, कॉलेज - विश्व, कथासूत्रातील नाविन्यता, चकचकित फ्रेश- सादरीकरण, नात्यांमधला गोडवा अत्यंत सुरेख पद्धतीने दाखवला आहे.



इथेच टाका तंबू या मालिकेच्या शीर्षक गीताचे संगीत दिग्दर्शन पोस्टकार्ड आणि अवताराची गोष्ट या चित्रपटाचे संगीतकार गंधार यांनी केले असून त्यांनी स्वत: ते गायले देखील आहे. या गाण्यात जयदीप वैद्य, प्रियांका बर्वे, आशिष कुलकर्णी यांनी देखील गंधार यांना साथ दिली आहे. श्रीरंग गोडबोले यांनी हे गीत लिहिले आहे. शशांक केतकर, मधुरा देशपांडे जे या मालिकेत कपिल साठे आणि गौरी मयेकर यांची भूमिका साकारणार आहेत यांच्यावर  चित्रित असून या दोघांबरोबर शीर्षक गीतामध्ये त्यांचे मालिकेतील सहकलाकार देखील दिसणार आहेत. गाण्याच्या शब्दांमधून मालिकेच्या कथासूत्राविषयी, पात्रांच्या अतरंगी व्यक्तिमत्वासंबंधी आणि मालिकेमध्ये असलेल्या भिन्न भिन्न व्यक्ती आणि वल्लींविषयीचा अचूक अंदाज येतो. धमाकेदार असे शब्द संयोजन करून बनवलेले मालिकेचे गीत, त्यातूनच निर्माण झालेला मिश्कीलपणा,


आपलेपणा हि या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत.  अत्यंत खुमासदार पद्धतीने मालिकेच्या संगीताची रचना केली आहे. शीर्षक गीताच्या दिग्दर्शनामध्ये कोकणचे सौंदर्य, कधीही न पाहिलेल्या व्यक्तिरेखा, मालिकेचे कथासूत्र यांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रेक्षकांनी मराठीत कधीही न पाहिलेल्या संकल्पना, कार्यक्रम झी युवा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार, तसेच प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी विनोदि बघायला मिळणार आहे यात वाद नाही. 



शीर्षक गीताबरोबर मालिकेमधील हि सगळी पात्र पडद्यावर एकत्र येऊन नक्कीच मज्जा, मस्ती आणि हास्याचे स्फोट घडवत प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार हे नक्की. परस्परविरुद्ध पात्रे, इरसाल माणसांची कथा आणि व्यथा, त्या माणसांच्या कचाट्यात सापडलेल्या दोन प्रेमिकांची कुरकुरीत पण तितकीच अनेक ट्विस्ट असलेली भन्नाट गोष्ट म्हणजे इथेच टाका तंबू हे या शीर्षक गीतातून समजतं. हि मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अस म्हणायला हरकत नाही.