कल्याण : येथील 27 गावांचा पाणीप्रश्न कमालीचा पेटलाय. सर्वपक्षीय नगरसेवकांना अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयात सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेचे अधिकारी पाणीप्रश्नी गंभीर नसून मंजूर झालेल्या कामाच्या फायलींवर सह्या करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी केलाय. 


याबाबत महापालिका अधिकारी राठोड यांना जाब विचारायला गेले असता राठोड यांनी उडवाउडवीची उत्तरं देत फाईल भिरकावल्याचा आरोप भोईर यांनी केलाय. या प्रकाराने संतापलेल्या भोईर आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर नगरसेवकांनी निषेध व्यक्त करत पालिकेच्या कार्यालयात घोषणाबाजी सुरू केली. 


हा प्रकार कळताच 27 गावातल्या इतर नगरसेवकांनी ई प्रभाग कार्यालयात धाव घेतली. लोकप्रतिनिधींशी उर्मट वर्तन करणाऱ्या अधिका-याचं निलंबन करण्याची मागणी करत पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन महापालिकेतील सर्व गटनेते, पदाधिकारी, आणि स्वतः महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ई प्रभाग कर्यलायात धाव घेत नगरसेवकांची समजूत काढली. अखेर तीन तासांनी हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं.