मुंबई : राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. या महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखांच्या घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 3 ऑक्टोबरला आरक्षण सोडत होणार आहे तर उल्हासनगरसाठी 30 सप्टेंबर आणि उर्वरित महानगरपालिकांसाठी 7 ऑक्टोबरला सोडत होणार आहे. 


आरक्षण सोडतीनंतर प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करता येतील, असं सहारियांनी सांगितलं आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा महानगरपालिकांची मुदत मार्च-एप्रिल 2017 मध्ये संपत आहे. तत्पूर्वी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.


राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेला 23 सप्टेंबर 2016 पर्यंत मान्यता देण्यात येईल. त्यानंतर संबंधित तारखांना महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाबाबत सोडत काढण्यात येईल.


आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत मुंबईसाठी 5 ते 20 ऑक्टोबर, तर उर्वरित महानगरपालिकांसाठी 10 ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत संबंधित महानगरपालिकेत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत कलेले अधिकारी 4 नोव्हेंबर 2016 पर्यंत सुनावणी देतील. 


मुंबई महानगरपालिकेसाठी 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत सुनावणी देण्यात येईल. 22 नोव्हेंबरला मुंबईची तर उर्वरित महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 25 नोव्हेंबर 2016 रोजी प्रसिद्ध केले जाईल, असंही श्री. सहारिया यांनी सांगितले.