जळगाव  :  भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर गुलाबराव पाटील यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली. आता मंत्रिपदाच्या निमित्ताने त्यांना संधी मिळाली आहे, त्यामुळे या संधीचे त्यांनी सोने करावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी  खडसे मंत्रिपदी असताना वेळोवेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज, कर्जाचे पुनर्गठन, पीकविमा आदी प्रश्‍नांवरून वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती. याच प्रश्‍नांवरून गुलाबरावांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जाहीर सभा घेत त्यांनी खडसेंवर थेट टीकाही करत, मात्र महिनाभरात राजकीय चित्र एकदम पालटले. खडसेंचे मंत्रिपद गेले आणि राज्यमंत्री म्हणून आता गुलाबरावांना संधी मिळाली, तेव्हा गुलाबराव पाटील आता काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.


गुलाबरावांच्या निमित्ताने एका सामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपदाची संधी मिळाली ही मोठी गोष्ट आहे, त्यांना यासाठी शुभेच्छा. आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले. अगदी सरकारच्या धोरणावरही टीका केली. आता तर ते स्वतः सरकारमध्ये मंत्री झालेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांना संधी असून, त्या संधीचे ते सोने करतील, अशी अपेक्षा आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.