पनवेल : रायगड जिल्हातील पनवेल येथे एकाच दिवसात चार वेगवेगळ्या हत्या झाल्यात. या प्रकाराने पनवेल हादरले आहे. दोन महिलांचा निर्घृण खून तर बांधकाम वादातून दोन पुरुषांची रॉडने मारहाण करुन हत्या करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत. इथे एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकरणात चार जणांची हत्या झाल्यात. सिमरन मोटार शेजारील बायपास रोडजवळील झुडपात 30-35 वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करुन पाच पिशव्यांमध्ये ते टाकण्यात आले होते. अजूनही या मृत महिलेची ओळख पटलेली नाही. असाच एक मृतदेह खांदेश्वरजवळील आदई नाक्याजवळ असणा-या वीटभट्टी शेजारी एका 40 वर्षीय महिलेची मृतदेह आढळला. 


महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर येतंय. यानंतर पनवेल जवळील विचुंबे गावात दुहेरी हत्याकांड घडलंय. रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृतरित्या करण्यात आलेल्या बांधकामावरुन दोघांची हत्या करण्यात आलीय. 


54 वर्षीय लक्ष्मण म्हात्रे आणि 19 वर्षीय रुपेश म्हात्रे यांची घरात घुसत रॉडने मारहाण करुन हत्या करण्यात आली... कुटुंबातील सहाजणांनी ही हत्या केल्याचं समोर येतंय. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलीय. मात्र या सगळ्या घटनांमुळे पनवेलमध्ये कायदा सुव्यवस्थेचा  गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.