अहमदनगर : सोशल साईटचा वापर सामाजीक कार्यासाठी कसा फायदेशीर ठरु शकतो हे श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावानं पटवून दिलंय. व्हॉट्सअप, WEचॅट, फेसबुक यातच हल्लीची तरुणाई जगते आहे. अगदी खेड्यापाड्यातही या सोशल साईट्सचा चांगलाच बोलबाला आहे. मात्र या साईट्सचा विधायक कामासाठी कसा वापर करायचा हे पहायचं असेल तर जरा श्रीरामपूर तालुक्यातल्या खंडाळा गावात डोकावून बघावं लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉअॅपच्या कृपेनं या गावात जलयुक्त शिवाराचं काम सुरु झालंय. गावातून प्रवरेचा कालवा वहातो. मात्र यावर्षी दुष्काळामुळे कालवा कोरडा पडला आणि गावात पाणीबाणी सुरु झाली. अशात भविष्यात हे दिवस पुन्हा नको म्हणून गावातल्या काही तरुणांनी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचं ठरवलं. पण यासाठी त्यांनी शासनाच्या आर्थिक मदतीची वाट पाहिली नाही. तर व्हॉट्स अॅपवर खंडाळा विकास फाऊंडेशन गृप तयार केला आणि प्रत्येक सदस्याकडून 1200रुपये निधी जमा केला. ज्यांना ही रक्कम देणं शक्य झालं नाही त्यांनी यथा शक्ती मदत केली आणि श्रमदानातून गावातील बुजलेल्या ओढ्याचं रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम सुरु केलं. 


एरव्ही गावकीच्या राजकाणामुळे एकमेकांची तोंडंही न पहाणारे गावकरी विकासाच्या कामासाठी मात्र हटकून एकत्र आलेत आणि नोकरी निमित्त परगावी गेलेल्या तरुणांनीही त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे एक नवा आदर्श या गावातील तरुणाईनं घालून दिलाय.