लातूर : शहरासह उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक शहरं आणि गावांना पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण सध्या भरभरून वाहत आहेत. या धरणाचे ०६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी कोरडे असलेले हे धरण भरभरून वाहत आहे. भरभरून वाहणारं मांजरा धरण पाहण्यासाठी जवळपास १० वर्षाची वाट पाहावी लागली. हे धरण भरल्यामुळे लातूर शहर, उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न पुढील तीन वर्षासाठी मिटला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती पूर्णपणे निवळलीये. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 30 हजार हेक्टरवरील ऊडीदाचे नुकसान झाले असून सोयाबीनचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे. साक्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांना आणि नाल्यांना पूर आला असून, अतिरिक्त पाण्याच्या दबावामुळे तालुक्यातील खुडाने आणि छडवेल या दोन ठिकाणी पांझरा तलाव फुटले आहेत. या तलावातील पुराच्या पाण्यामुळे अनेक जनावरे दगावली असून प्रशासनाने मात्र हे नाकारलं आहे. पुराच्या पाण्यात शेकडो हेक्टर शेत पीक वाहून गेली आहेत.