नांदेड : गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे कर्मचा-यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कारण वीज नसल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी जनरेटरची मदत घ्यावी लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धरणातून 66 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विशेष म्हणजे विष्णुपुरी धरणाचा विद्युतपुरवठा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. अंधारात इथला कारभार सुरू आहे. 


नांदेडच्या पाटबंधारे विभागावर वीज बीलाचे 25 कोटी 40 लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे विद्युत विभागानं 2013 साली विष्णूपुरी धरणाचा वीजपुरवठा खंडित केला. 


ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींनी उर्जामंत्र्यांच्या कानावर घातल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र अजुनही वीजपुरवठा सुरु करण्यात आलेला नाही. आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली तर विद्युतपुरवठ्या अभावी विष्णुपुरी धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.