कोल्हापूर : पंचगंगा नदी यावर्षी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलीय. पंचगंगेच्या पातळीत गेल्या २४ तासात तब्बल १० फुटांनी वाढ झालीय. काल राजाराम बंधाऱ्यांची पातळी २३ फूट इतकी होती ती आज ३४.६  फुटावर गेलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यात गेले चार दिवस संततधार सुरूच आहे. त्यामुळं जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या  प्रमाणात वाढ झालीय. पंचगंगा नदीवरील प्रमुख ७ बंधाऱ्यांसह जिल्ह्यातील एकूण ३६ बंधारे पाण्याखाली गेलेत. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ४३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालीय. 


गगनबावडा  तालुक्यात सर्वाधिक १०२ मिलीमीटर इतका पाऊस झालाय. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ होतीय. 
कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरणारे राधानगरी धरण ९९ टक्के इतकं भरलय. त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता कोणत्याही क्षणी खुले होण्याची शक्यता आहे.