जळगाव : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जळगावमधल्या भादली इथल्या बालकवींच्या स्मारकाचं नूतनीकरण तसंच प्रशस्त जागेत स्थलांतरणाचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढल्या वर्षी मे महिन्यात बालकवींचा शंभरावा स्मृतिदिन आहे. त्याचं औचित्य साधत रेल्वेमंत्र्यांनी हे आदेश दिलेत. 


5 मे 1918 रोजी भादली रेल्वे स्थानकावर बालकवींचा अपघाती मृत्यू झाला. बालकवींच्या जन्मशताब्दी निमित्त, भादली रेल्वे स्थानकावर 1990 साली बालकवींचं स्मारक बनवलं गेलं.


मात्र, आता जळगाव जिल्ह्यात रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे भादली रेल्वे स्टेशनजवळचं बालकवींचं हे स्मारक धोक्यात आलंय. त्याबाबतचं वृत्त सर्वप्रथम 'झी 24 तास'नं दाखवून, या प्रश्नाला वाचा फोडली होती. 'झी 24 तास'च्या या वृत्ताची राज्य सरकार पाठोपाठच रेल्वे मंत्र्यांनीही दखल घेतलीय.