नाशिक : नाशिककरांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागलाय. या आधी दोन वेळा पाणी बचतीचं नियोजन फिसकटल्याने प्रचंड गैरसोय झाली होती. नागरिकांकडून पुन्हा ओरड सुरू झाल्याने आता दर गुरूवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगापूरमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यात आलं तेव्हापासूनच खरंतर नाशिककरांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. उन्हाचा कडाका वाढतोय. तसंच धरणातलं पाणीही वेगाने तळ गाठतंय. त्यामुळे पाणीबाणी वाढतेय. त्यातच शहरात मनसे आणि भाजप पाणीकपातीचं राजकारण करतंय. त्यामुळे पाणीबचतीचं नियोजन पूर्ण फिसकटलंय. त्यामुळे आता दर गुरूवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 


दर गुरूवारी संपूर्ण पुरवठा बंद ठेवल्यामुळे शुक्रवारीही कमी दाबानेच पुरवठा राहण्याची शक्यता आहे. गंगापूर धरणात 1538 दशलक्ष घनफूट साठा शिल्लक आहे. 31 जुलैपर्यंत पाणी पुरवायचं आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नागरिकांनीही तातडीने पाणी बचत करणं गरजेचं आहे.