नाशिक : शहराचे भविष्य घडवायचे असेल तर मनसेशिवाय पर्याय नाही... नाशिककरांनी निर्णय घ्यायचा आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेलाच सत्ता खुर्चीवर बसवण्यासाठी जनतेला साद घातलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी, त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. 'थापा' या शब्दाला पर्यायी शब्द आला आहे 'भाजपा' असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'भाजपकुमार थापाडे' असा केला. यावेळी, त्यांनी यंदाच्या निवडणुकीतली आणि जाहीर भाषणातली पहिली मिमिक्रीही करून दाखवली... त्यावर उपस्थितांत जोरदार हशा तर पिकलाच पण राज यांच्या या मिमिक्रीला जोरदार टाळ्याही मिळाल्या. 
  
२०१४ च्या निवडणुकीच्या वेळेस पंतप्रधान म्हणाले होते प्रत्येक नागरिकाच्या खात्यात मी १५ लाख टाकणार... थापा या शब्दाला पर्यायी शब्द आला आहे भाजपा... थापेबाज मुख्यमंत्री... 'भाजपकुमार थापाडे' उद्या नाशिकमध्ये येऊन थापा मारतील... मेट्रो, मोनो, विमानतळं अशी वाट्टेल ती आश्वासनं देतील, असं म्हणत राज ठाकरेंनी टीका करण्याची संधी सोडली नाही. जे राष्ट्रवादी करत होती तेच भाजप करत आहे... भाजपला सत्तेचा माज आलाय, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 


आज सत्ताधारी नाशिकमध्ये झालेल्या प्रचारसभेत नाशिकचा विकास व्हावा असं वाटत असेल तर पुन्हा एकदा सत्ता मनसेच्या हातात द्यावीच लागेल, असं म्हणत पुन्हा एकदा मनसेलाच मत देण्याचं आवाहन राज ठाकरेंनी नाशिककरांना केलंय.