मुंबई : दिल्लीतल्या सम-विषम फॉर्म्युल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही अशा प्रकारची योजना राबवण्याचा विचार मुंबई पालिका करत आहे. त्यासाठी पालिकेच्या वाहतूक खात्याने एक अहवाल बनवला असून तो लवकरच पालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर केला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईत सम-विषम सारख्या फॉर्म्युल्याची गरज असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अजोय मेहता यांना हा अहवाल सादर केल्यानंतर तो मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल. पालिकेत सेनेची सत्ता असली तरी या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही हे सर्व राज्य सरकारवर अवलंबून असल्याचं अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले.


मुंबई हायकोर्टातही याप्रकरणी याचिका दाखल असून कोर्टाने पालिका, राज्य सरकारकडे या फॉर्म्युल्याच्या अंमलबजावणीबाबत विचारणा केली होती. विशेष म्हणजे सम-विषम फॉर्म्युल्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यानी याआधी स्पष्ट केले आहे. पण पालिकेच्या या अहवालानंतर राज्य सरकार त्याचा विचार करु शकते, अशी चर्चा आहे.