मुंबई : ८ मुलींना हॉटेलमधील खाण्यातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झालाय. प्रणाली जाधव हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या सात मैत्रिणी आल्या होत्या. यावेळी या सगळ्यांनी केक कापून प्रणालीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर पार्टी करण्यासाठी या आठही जणी नजीकच्या हॉटेलमध्ये गेल्या. तिथं त्यांनी चायनीज खाल्लं. मात्र चायनीज खाताच या सगळ्या मुलींना उलटी, चक्कर आल्यासारखं जाणवू लागलं. खबरदारीचा उपाय म्हणून या आठही जणींना नजीकच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.


ज्या हॉटेलमध्ये या मुलींनी चायनीज खाल्लं ते बंद करण्यात यावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मात्र हॉटेल मालकानं हे आरोप फेटाळले आहेत. पोलिसांनी केकचं दुकान आणि हॉटेलमधील चायनीज वस्तूंचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेत. या लॅबच्या अहवालानंतरच या मुलींना कशामुळे विषबाधा झाली हे स्पष्ट होईल.