मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशी मागे घेतला. डॉक्टरांनी रुग्णांना वेठीस धरत संप पुकारला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी संप मागे घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तसेच सुरक्षा करण्याबाबत राज्य सरकारला स्पष्ट शब्दात बजावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी न्यायालयाने रूग्णालयांमध्ये रूग्णासोबत त्याचे फक्त दोनच नातेवाईक थांबू शकतील, असा नियम करण्याची सूचना राज्य सरकारला केली. रूग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांकडून पुकारण्यात आलेल्या संपबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सर्व डॉक्टरांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिलेत. 


दरम्यान, भविष्यात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्यानुसार रूग्णालयात रूग्णांबरोबर केवळ दोनच नातेवाईकांना थांबता येईल, असा नियम तयार करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. याशिवाय, न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रूग्णालयांमध्ये ११०० सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्याचेही आदेश दिले आहेत.


दरम्यान, आजच्या सुनावणीदरम्यान निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने संप मागे घेणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे चौथ्या दिवशी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला. डॉक्टरांच्या संपामुळे होणारे रुग्णांचे हाल थांबण्यास मदत होणार आहे.