मुंबई : १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी नंतर माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा विशेष इडी कोर्टात हजर केले. यावेळी सुनावणी सुरु होताच इडीने समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.  त्यावर न्यायालयाने समीर भुजबळ यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीर भुजबळ यांच्या परवेश कंपनी मार्फत आणखी ३० कोटी रुपयांचे अनधिकृत ट्रान्सॅक्शन आढळून आलेत. याआधारे तपास करुन इडी आणखी एकाला अटक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती इडी सुत्रांनी माहिती दिलीये. याच आधारे आज इडीने समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी विशेष इडी न्यायालयात केली.


ईडीने आज न्यायालयात सादर केलेल्या रिमांड पत्रानुसार समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्या मार्फत प्रवेश या कंपनीत जवळपास ३० कोटी रुपयांचे नवीन ट्रान्सॅकशन आढळले आहे. जे रोख आणि चेक मार्फत हे पैसे दोन कंपन्यांना वळते करण्यात आलेत. त्याआधारे आणखी तपास करायचा असल्याने इडी ने समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.


गेल्या सुनावणीच्या वेळेस ईडीने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड पत्रानुसार समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यांतून जवळपास ८७० कोटी रुपयांची अफरातफर केल्याची माहिती कोर्टाला दिली होती. त्यापैकी १७० कोटी रुपयांचे कागदोपत्री पुरावे सापडलेत. समीर भुजबळ यांच्या कंपन्यांचे शेअर्स ठेकेदारांनी चढत्या भावाने विकत घेतले. 


समीर भुजबळ यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याच्या बदल्यात गुंतवणुकदारांना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विविध कामे देण्यात आली. शिवाय १२५ कोटी रुपये समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यांनी विविध ठिकाणी गुंतवले आहेत. त्याबाबत समीर भुजबळ हे योग्य ते पुरावे देवू शकले नाहीत. या सर्व कोट्यवधी रुपयांच्या अफरातरफरीची चौकशी करण्यासाठी इडीला आणखी वेळ हवी होती त्यामुळे त्यांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली.