मुंबई : 'भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकावणार' असं म्हणत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा पोपट मेल्याचं जाहीर केलं... याचसोबत त्यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या शिवसेनेच्या अपमानाचा बदला घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही युती तुटल्याचं जाहीर झालं होतं... मात्र, ही घोषणा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली होती... आज जाहीर सभेत बोलताना त्यावेळी शिवसेना गाफील होती, असं खुद्द उद्धव ठाकरेंनीच मान्य केलं. युती तुटल्यामुळे अपमानासोबतच शिवसेनेत भाजपनं विश्वासघात केल्याची भावना तग धरून होती...


त्यामुळे आज उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना साद घालत अखेर निर्णय घेतला आणि स्वबळावर लढण्याची घोषणा केली... उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या अपमानाचा बदला घेतल्याची भावना अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केली.


एकनाथ खडसेंनी तोडली युती....


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युती तोडून टाका, असे जेव्हा सांगितले, तेव्हा आपणच शिवसेना-भाजपची युती तोडण्याची घोषणा करण्याची जबाबदारी घेतली. कारण याबाबत प्रत्येकजण शिवसेना नेत्यांना फोन करून सांगण्यास नकार देत होता. त्यामुळे ही मी जबाबदारी घेतली, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी जळगावात एका कार्यक्रमात बोलताना केला होता. इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटली नसती, तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असता, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं होतं.