मुंबई : बॉलीवूडच्या गाजलेल्या, नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक असलेला अभिनेता विनोद खन्ना यांचं निधन झालं आहे. विनोद खन्ना ७० वर्षांचे होते. दीर्घ आजारानंतर मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये विनोद खन्ना यांचं २७ एप्रिल २०१७ रोजी निधन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९४६ मध्ये पेशावरमध्ये त्यांचा जन्म झाला होता, त्यांनी १४० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं.


१९६८ साली सुनील दत्तच्या मन का मीत या सिनेपासून फिल्मी करिअरला सुरूवात झाली. पदार्पणात त्यांनी खलनायक आणि सहाय्यक अभिनेत्याची भूमिका पार पाड़ली.


'मेरे अपने', 'दयावान', 'कुर्बानी', 'मेरा गांव मेरा देश', 'मुकद्दर का सिकंदर', 'लेकिन', 'हेराफेरी', 'अमर अकबर एंथनी', 'जुर्म', 'चांदनी', और 'क्षत्रिय' सारख्या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका यादगार ठरल्या.


फिल्मी करिअरच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी अभिनयाला बाय बाय करत, आध्यात्मिक गुरू रजनीश यांचं शिष्यत्व स्वीकारलं. यानंतर १९८७ मध्ये त्यांनी पुन्हा पदार्पण केलं, तेव्हा त्यांनी सत्यमेव जयते हा सिनेमा केला.


१९९७ मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले, त्यांनी पंजाबच्या गुरूदासपूरमधून खासदारकीची निवडणूक जिंकली.


विनोद खन्ना यांनी १९९८, १९९९, २००४, २०१४ लोकसभा निवडणूक जिंकली, मात्र २००९मध्ये त्यांचा पराभव झाला.


अटल बिहारी वाजयेपी सरकारमध्ये त्यांना पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रीपद देण्यात आलं होतं, यानंतर त्यांना परराष्ट्र राज्य मंत्र्याचा कारभार सोपवण्यात आला.