राजीव रंजन सिंह, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या सागरी किनारी भागात वायरलेस रेडिओच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय. वायरलेस रेडिओमुळं देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचं कारण देत, केंद्र सरकारनं ही बंदी घातलीय...


रेडिओचा धोका...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार्ली... चार्ली... रोजर्स... रोजर्स... वायरलेस सेटवरून तुम्ही हे आवाज नेहमीच ऐकले असतील... पण याचा अर्थ काय, ते कदाचित तुम्हाला माहित नसेल... रेडिओवरून संवाद साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक सांकेतिक नाव दिलेलं असतं... चार्ली, रोजर्स... असं... मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या सागरी किनारी भागात हॅम रेडिओ वापरणाऱ्यांना काही विचित्र आवाज ऐकू आले... 


हे आवाज भारतीय भाषांतले नव्हते... हॅम रेडिओ वापरणाऱ्यांनी या संशयास्पद प्रकाराची लेखी तक्रार केंद्रीय गृह खात्याकडं केली. या प्रकरणी केंद्र सरकारनं आपल्या विविध खात्यांमार्फत चौकशी अहवाल मागवले. मुंबई पोलीस, तटरक्षक दल, नौदल यांनीही विविध ठिकाणांहून माहिती गोळा करायला सुरूवात केली.


हॅम रेडिओच्या ७८ सदस्यांनी केलेल्या या लेखी तक्रारीची गंभीर दखल घेत, केंद्र सरकारनं आता बिगर नोंदणीकृत वायरलेस रेडिओ सेटच्या वापरावर बंदी घातलीय. या वायरलेस रेडिओ सेटची अगदी सहज ऑनलाइन विक्री सुरू असते. त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन, सरकारनं हा खबरदारीचा उपाय आखलाय. 


सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचं अनन्य साधारण महत्त्व आहे. पण सरकारी माहिती देशविघातक शक्तींच्या हाती पडू नये, याचीही काळजी घेण्याची गरज आहे. बिगर नोंदणीकृत वायरलेस रेडिओ सेटमुळं ही माहिती समाज कंटकांच्या हाती पडण्याची भीती होती. बंदीमुळं थोडाफार का होईना, त्याला आळा घालता येईल, अशी सुरक्षा यंत्रणांना आशा आहे.