मिरपूर: आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे आणि आशियातले राजे आपणच आहोत हे सिद्ध केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसामुळे ही मॅच 15 ओव्हरची खेळवण्यात आली. टॉस जिंकून धोनीनं बांग्लादेशला पहिले बॅटिंगला पाठवलं. बांग्लादेशनं 15 ओव्हरमध्ये 120 रन केल्या आणि भारताला विजयासाठी 121 रनचं आव्हान ठेवलं.


बांग्लादेशला 120 रनपर्यंत पोहोचवायला मदत केली ती शब्बीर रेहमान आणि मेहमदुल्लानं. शब्बीरनं 29 बॉलमध्ये नाबाद 32 रन तर मेहमदुल्लानं फक्त 13 बॉलमध्ये 33 रनची खेळी केली. भारताकडून अश्विन, नेहरा, बुमराह आणि जडेजाला प्रत्येकी एक विकेट मिळाली, तर बांग्लादेशचा एक बॅट्समन रनआउट झाला. 


121 रनचा पाठलाग करायला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा 1 रनवर आउट झाला. त्यानंतर मात्र शिखर धवन आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला, आणि विजय निश्चित केला. 


शिखर धवननं 44 बॉलमध्ये 60 रन केल्या, तर विराट कोहलीनं 28 बॉलमध्ये 41 रनची खेळी केली. धवन आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या धोनीनं 6 बॉलमध्ये 20 रन केल्या आणि विजयी सिक्स मारून भारताला जिंकवून दिलं.