रायपूर: आयपीएलच्या ग्रुप स्टेजमधल्या शेवटच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सहा विकेट्सनं पराभव केला आहे. आरसीबीच्या या विजयामुळे त्यांनी आयपीएलमधलं आपलं प्ले ऑफमधलं स्थान निश्चित केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात लायन्स, रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर, सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या चार टीम प्ले ऑफमध्ये खेळतील. पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या गुजरातची मॅच चार नंबरवर असलेल्या केकेआरबरोबर होईल, तर आरसीबी आणि हैदराबादमध्ये दुसरा सामना रंगेल.


दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये आरसीबीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. कोहलीचा हा निर्णय आरसीबीच्या बॉलर्सनी योग्य ठरवला आणि दिल्लीला 20 ओव्हरमध्ये फक्त 138 रन करून दिल्या. आरसीबीचा लेग स्पिनर चहालनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर दिल्लीकडून क्वानटन डीकॉकनं सर्वाधिक 60 रन केल्या. 


त्यानंतर 139 रनचा पाठलाग करायला आलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. क्रिस गेल फक्त एक रनवर तर एबी डिव्हिलियर्स 6 रनवर आऊट झाले. पण नेहमीप्रमाणेच या मॅचमध्येही विराट कोहलीनं नाबाद 54 रन केले. कोहलीला के.एल.राहुलनं 38 रन करून चांगली साथ दिली आणि आरसीबीचं प्ले ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न पूर्ण केलं.