मुंबई : राज्यात आजपासून माध्यमिक शालांत अर्थात दहावीची परीक्षा सुरु होते आहे. एक एप्रिल पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. राज्यभरातून सुमारे 17 लाख 66 हजार विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. तर राज्यातल्या चार हजार हून जास्त केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.


राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेण्यात येते आहे. या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समुपदेशक आणि दरवर्षी सारख्या हेल्पलाईन असणार आहेत. पेपरफुटी सारख्या घटना टाळण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा सुपरवायझरला फोन सोबत ठेवता येणार नाही आहे. यासोबतच उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची वेगळी नोंद ठेवण्यात येणार आहे.