निलेश वाघ , झी २४ तास , वणी :- नाशिकमध्ये रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. हे सर्वजण सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, सप्तश्रृंगी गडावरून परतत असताना नाशिक-वणी रस्त्यावरील कृष्णगावजवळ भाविकांचा टेम्पो बंद पडला. त्यामुळे हे सर्वजण रस्त्यावर दुसऱ्या वाहनाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने या भाविकांना चिरडले. हे सर्वजण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे रहिवासी आहेत. 


सप्तश्रृंगी देवीच्या नवसपूर्तीसाठी हे सर्वजण गडावर केले होते. मात्र, तेथून परततानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. मृतांमध्ये गणेश भगवतीप्रसाद ठाकूर(३१) , कुणाल  कैलास ठाकूर (२५), आशीष  माणिक  ठाकूर (२५) व सागर  अशोक ठाकूर (२३) यांचा समावेश आहे. तर सहापैकी दोन जखमी लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींवर नाशिक आणि वणीच्या रुग्णालायत उपचार सुरु आहेत.