अवकाळीचा मान्सूनवर परिणाम? IMD नं स्पष्ट सांगितली परिस्थिती
ऐन उन्हाळ्यात पावसाचा मारा होत असल्यामुळं काही दिवसांनी मार्गस्थ होणाऱ्या मान्सूनवर याचे काय परिणाम होणार याबाबतची स्पष्ट आणि सविस्तर माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.
जागतिक स्तरावर हवामान संस्था अल निनोच्या परिणामांसाठी तयार राहा असे इशारे देत असताना भारतातील मान्सूनवर मात्र त्याचे परिणाम होणार नसल्यामुळं शेतकरी आणि नागरिकांना चिंता करू नये असं म्हणत IMD नं दिलासा दिला आहे.
उन्हाळ्यातच पावसानं थैमान घातल्यामुलं पावसाळ्यात काय दिवस पाहावे लागणार अशी चिंता लागलेली असतानाच अवकाळी पाऊस आणि मान्सून हे वेगवेगळे विषय असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यत आलं.
थोडक्यात ज्याप्रमाणं आयएमडीनं अंदाज वर्तवला आहे त्याचप्रमाणं यंदाच्या वर्षी 96 टक्के म्हणजेच सर्वसाधारण प्रमाणात मान्सूनची हजेरी पाहायला मिळेल. अल निनोच्या प्रभावातही मान्सूनचं प्रमाण घटलं नसल्याचं निकीक्षण अधोरेखित करत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, अवकाळी पाऊस का बरसतो याचं कारण तुम्हाला माहितीये का? उन्हातच्या तीव्रतेमुळं जमीन खूप तापते. चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होते आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तापलेल्या जमिनीवर ढग तयार होऊन पाऊस पडतो, तोच अवकाळी म्हणून ओळखला जातो.
अल निनो या एका घटकासोबतच हिंदी महासागरातील सातत्यानं बदलणारं तापमान, उष्णकटीबंधीय प्रदेशाचं हवामान या घटकांचाही मान्सूनवर परिणाम होतो. त्यामुळं एकट्या अल निनोनं मान्सूनवर गंभीर परिणाम होणार नाहीत हे खरं.
(सर्व छायाचित्र- स्कायमेट)