पावसाळ्यात खायलाच हव्यात `या` भाज्या, दिसतील फायदेच फायदे
रोगराईचं साम्राज्य जास्त असल्याने पावसाळ्यात बाहेरील अन्न पदार्थ, मासांहारी आणि पालेभाज्या खाणं सहसा टाळावं असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
त्याऐवजी फळंभाज्यांचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
चवीला कडू असलेली कारल्याची भाजी अनेकांना आवडत नाही, मात्र पावसाळ्यात कारल्याची भाजी खाणं हे आरोग्यवर्धक मानलं जातं. पावसाळ्यात कारल्याचं सेवन केल्याने आतड्यांचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे कावीळ सारखे आजार दूर राहण्यास मदत होते.
असं म्हणतात की, ज्या सिझनमध्ये येतात त्या भाज्या खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. पावसाळ्यात दुधीचा आहारात समावेश करावा. दुधीमध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे ताप आणि खोकला सारखे आजार दूर होतात. आजारी व्यक्तीला दुधीचं सूप दिल्याने अशक्तपणा दूर होतो.
पडवळ खाल्याने पोटाचे विकार नियंत्रणात राहतात. अनेकदा पावसाळ्यात बाहेरील अन्नपदार्थ खाल्याने किंवा खराब पाण्यामुळे अतिसार होतो. म्हणूनच पडवळीचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
पावसाळ्यात कोकण पट्ट्यात रेताळ ठिकाणी भूछत्र येतं. हरीतद्रव्य नसलेलं भूछत्र अनेक आजारांशी सामना करण्याचं बळ देतं. मशरूममध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पावसाळ्यात आहारात याचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.
चिखलाच्या संपर्कात आल्याने अनेकांना पावसात त्वचा विकाराची समस्या होते. त्वचेवर खाज येणं, लाल रंगाचे पुरळ येणं हा त्रास बऱ्याच जणांना होतो. तोंडली खाल्ल्याने अॅलर्जीचा त्रास होत नाही. म्हणूनच पावसाच्या दिवसात तोंडलीचं सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)