पुणे :  महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस पहायला मिळत आहे. आता पुणे जिल्ह्यात शिवसेना नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर मोठा आरोप केला आहे. (Shivaji Adhalrao Patils serious allegations against NCP and Dilip Walse Patil)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही महाविकास आघाडी आम्ही मान्य केली असून, आघाडीची तत्वे पाळत आहोत. मात्र जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचा डाव राष्ट्रवादीचा असल्याचे दिसून येत आहे. आमचं अस्तित्व राहूद्या जास्त आमची काहीही आमची मागणी नाही. शिवसैनिकाला सुखाने जगू द्या.' असं माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.


'आढळराव पाटील यांनी स्थानिक राजकारणाबाबत सूचक भाष्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सगळंच अलबेल असल्याचं दिसत नाही. त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडीबद्दल गेल्या 2 वर्षापासून वाईट अनुभव आहे.


खेड तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती 6 महिने तुरूंगात होते. लांडेवाडीतील बैलगाडा शर्यत रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. शर्यतीला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आम्ही शर्यत आयोजित केली म्हणून ती इतरांच्या डोळ्यात खूपली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली'. 


'हे सगळं शिवसेनेला संपवण्याचं कारस्थान आहे. जिल्ह्यातील विरोधक आणि प्रशासनाने मिळून केलं आहे. आमचं अस्तित्व राहू द्या. आम्हाला मारू नका. 


गृहमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. वरिष्ठांच्या कानावरप वेळोवेळी या गोष्टी सांगत आहोत.' अशीही खंत आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.


खेडमध्ये राजकीय संघर्ष


पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीतील निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर आढळराव पाटील यांनी अनेकदा गंभीर आरोप केले.


दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसला इशारा दिला होता. संजय राऊत म्हटले होते की, अजित दादा तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहो अथवा न राहो, खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल असे राऊत यांनी म्हटले आहे.