हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला. या पराभवाबरोबरच भारतानं ३ टी-२० मॅचची ही सीरिज २-१नं गमावली. तिसऱ्या मॅचमध्ये भारतीय टीमचा कर्णधार रोहत शर्मानं विजय शंकरला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं. या निर्णयामुळे मी देखील हैराण झाल्याची प्रतिक्रिया विजय शंकरनं दिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर माझ्या खेळामध्ये सुधार झाल्याचं विजय शंकरनं कबूल केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये विजय शंकरनं २८ बॉलमध्ये ४३ रन केले आणि सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये तो २३ रन करून आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय शंकरनं वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्नमध्ये झालेल्या मॅचमधून पदार्पण केलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या ५ वनडेपैकी ३ वनडे आणि सगळ्या टी-२०मध्ये विजय शंकर खेळला. २८ वर्षांच्या या ऑलराऊंडरनं वर्ल्ड कपमध्ये निवड होण्यासारखं प्रदर्शन केलं नसलं तरी, त्यानं प्रभावित मात्र केलं.


ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर विजय शंकर म्हणाला 'मला वरच्या क्रमांकावर बॅटिंग करायला आवडेल. तिसऱ्या क्रमांकवर बॅटिंगची संधी मिळाल्यामुळे मी हैराण झालो होतो. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये खेळण्यासाठी मी तयार होतो. जर तुम्ही भारतासारख्या टीममधून खेळत असाल, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तयार असावं लागतं.'


'ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमुळे मला बरच शिकायला मिळालं. मी जरी जास्त बॉलिंग केली नसली तरी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मला बॉलिंग करता आली. बॅटिंगमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना पाहिल्यावर बऱ्याच गोष्टी शिकल्या', असं विजय शंकरनं मान्य केलं.