ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डानं खेळाडूंना जबरदस्त झटका दिला आहे. मागच्या वर्षी खराब कामगिरी करणाऱ्या सहा क्रिकेटपटूंसोबतच्या कराराचं बोर्डानं नुतनीकरण केलेलं नाही. तर इतर खेळाडूंबरोबर करार करण्यात आला असला तरी या खेळाडूंच्या कराराची रक्कम वाढवण्यात आलेली नाही. ओपनर सौम्य सरकार आणि इमरूल कायेस या खेळाडूंसोबत बोर्डानं कराराचं नुतनीकरण केलेलं नाही, असं निवड समिती सदस्य हबीबुल बशर यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी बीसीबीनं १० खेळाडूंसोबतच्या कराराचं नुतनीकरण केलं. यानंतर तीन खेळाडूंना या यादीमध्ये टाकण्यात आलं. पुढच्या वर्षी नियमित क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाच आम्ही प्राधान्य दिलं आहे, असं बशर यांनी स्पष्ट केलं.


काही खेळाडूंनी त्यांचं टीममधलं नियमित स्थान गमावलं आहे. त्यांना संदेश देणं गरजेचं आहे. त्यांच्याशी करार करण्यात आलेला नाही म्हणजे त्यांचे निवडीचे दरवाजे बंद झालेले नाहीत. भविष्यामध्ये त्यांना योग्य संधी मिळेल, असं बशर म्हणाले आहेत. मोसादेक हुसैन, शब्बीर रहमान, तास्कीन अहमद आणि कमरूल इस्लाम या खेळाडूंसोबतही बांगलादेश बोर्डानं करार केलेला नाही.