कोलंबो : टी-20 ट्रायसीरिजमध्ये श्रीलंका बाहेर झाल्यानंतर आता भारत आणि बांग्लादेशमध्ये फायनल मॅच रंगेल. रविवारी हा महामुकाबला होणार आहे. आत्तापर्यंत भारत आणि बांग्लादेशमध्ये ७ टी-20 मॅच झाल्या आहेत. या सगळ्या मॅचमध्ये भारताला विजय मिळाला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये भारताचं पारडं जड आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांग्लादेशच्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं आहे. जिद्दीसाठी बांग्लादेशचे खेळाडू ओळखले जातात, असं दिनेश कार्तिक या मॅचच्या आधी म्हणाला आहे. बांग्लादेशविरुद्ध विजय झाला तर त्याचं कौतुक होत नाही. पण बांग्लादेशविरुद्ध पराभव झाला तर मात्र जोरदार टीका होते, अशी प्रतिक्रिया दिनेश कार्तिकनं दिली आहे.


बांग्लादेशच्या खेळाडूंवर कारवाई


श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशच्या खेळाडूंनी मैदानामध्ये लाजीरवाणं प्रदर्शन केलं. अंपायरच्या निर्णयाचा विरोध करताना बांग्लादेशच्या खेळाडूंचा तोल ढळला. या सगळ्या प्रकारानंतर बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनच्या मॅच फीमधली २५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे. तर बारावा खेळाडू असलेल्या नुरुल हसनचीही २५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे.


नेमकं काय झालं या सामन्यात?


कोलंबोमध्ये सुरु असलेल्या निदहास ट्रॉफी स्पर्धेत शुक्रवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सेमीफायनल रंगली. या सामन्यातील अखेरच्या षटकावरुन दोन्ही संघांमध्ये चांगलाच वाद रंगला.


यावेळी मैदानावरील खेळाडूंना आवरण्यासाठी माजी खेळाडूंना यात लक्ष घालावे लागले. मैदानावर श्रीलंका आणि बांगलादेशचे खेळाडू एकमेकांसमोर भिडले. इतक्यावरच हे थांबल नाही तर बांगलादेशच्या ड्रेसिंग रुममध्येही तोडफोड झाली. येथील काचा फोडण्यात आल्या.


क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, बांगलादेशच्या ड्रेसिंग रुममध्ये आतून तोडफोड करण्यात आली होती. बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बांगलादेशचे क्रिकेटर ड्रेसिंग रुमचे जिने ज्यावर काचा पसरल्यात त्यावरुन धावताना दिसतायत.   


ही घटना सामन्यातील अखेरच्या षटकांत सुरु झाली. या ओव्हरमधील दोनही बॉल नोबॉल होते असे बांगलादेशच्या क्रिकेटर्सचे म्हणणे होते मात्र अंपायरने त्याला नकार दिला. यामुळे संतापलेल्या शाकीब अल हसनने संघाला माघारी बोलावले. ५ मिनिटे हा ड्रामा सुरु होता. अखेर माजी क्रिकेटर खलिम मेहमूद यांनी मध्यस्थी घेतली. अखेर शाकिबला समजावल्यानंतर त्याने बॅटसमनना खेळण्यास मैदानात पाठवले. जर बांगलादेशच्या क्रिकेटर्सनी बॅटिंग केली नसती तर श्रीलंकेचा संघ जिंकला असता.