मुंबई : टीम इंडियामध्ये (Team India) सध्या खांदेपालट सुरु आहे. कर्णधारपदापासून ते प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येक बाबतीत टीम इंडियात बदल केले जात आहेत. हे बदल आगमी दिवसांमध्ये असेच सुरु राहणार आहेत, विशेष करुन टेस्ट टीम इंडियामध्ये. विराटने कसोटी कर्णधारपद (Captaincy) सोडलं आहे. त्यामुळे आता टेस्ट टीममध्ये कर्णधाराच्या निवडीसह अनुभवी खेळाडूंना संघातून बाहेर पडण्याची भिती सतावतेय. (bcci president sourav ganguly given hint about dropped to cheteshwar pujara and ajinkya rahane in team india)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुभवी खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोघांची नावं आघाडीवर आहेत. दोघेही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने निराशाजनक कामगिरी करतायेत.  दोघांच्या अशा कामगिरीमुळे त्यांना प्लेइंग इलेव्हनमधून काढून टाकावं, अशी मागणीही केली जात आहे. पण आता बीसीसीआय (Bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दोघांना टीममधून डच्चू देणार असल्याचे संकेत दिले आहेत.   


टेस्ट टीममध्ये रहाणे आणि पुजारा हे दोघे महत्त्वाचे खेळाडू आहेत. गेल्या दशकाभरात या दोघांवर टीम इंडियाची मदार आहे. मात्र दोघांना गेल्या 2 वर्षात त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेतही या दोघांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या दोघांची टीममधून हकालपट्टी होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. 


श्रीलंका मार्च महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेसाठी या दोघांच्या निवडीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र सौरव गांगुलीने आपल्या बाजूनेच निवड समितीचीही बाजू स्पष्ट केली आहे.      


गांगुली काय म्हणाला? 


"रहाणे-पुजारा हे दोघेही चांगले खेळाडू आहेत. आशा आहे की दोघे रणजी ट्रॉफीत खेळतील आणि खोऱ्याने धावा करतील, याबाबत मला खात्री आहे. मला यात काहीच अडचण वाटत नाही", असं गांगुलीने नमूद केलं. गांगुली स्पोर्ट्सस्टारसोबत बोलत होता. यावेळेस त्याने हे संकेत दिले. 


रणजी ट्रॉफी खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत आम्ही सर्व खेळलो आहोत. त्यामुळे ते दोघेही रणजी स्पर्धेते खेळतील आणि दणक्यात कमबॅक करतील", अशा आशावाद गांगुलीने व्यक्त केला. 


रहाणे-पुजाराऐवजी कोण? 


कसोटी संघात नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात यावी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून सातत्याने केली जात आहे. प्रामुख्याने हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर या दोघांना खेळवण्यात यावं, असं क्रिकेट चाहत्यांचं म्हणंन आहे.  विहारी गेल्या 3 वर्षांपासून टीम इंडियाचा भाग आहे. मात्र त्याला कमीच संधी मिळाली आहे. 


तर मुंबईकर श्रेयस अय्यरने नोव्हेंबर 2021 मध्येच कसोटी पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे श्रेयसने पदार्पणातच शतक लगावलं होतं. त्यामुळे या दोघांना श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.