Ind vs Eng Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने 3-1 अशी जिंकली आहे. (Team India beat England0 अतिशय नाट्यमय झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 5 विकेट राखून मात केली. स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) आणि युवा फलंदाज विकेटकिपर ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) या विजयाचे हिरो ठरले. इंग्लंडने विजयासाठी टीम इंडियासमोर 191 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे पार करताना टीम इंडियाची आघाडीची फळी झटपट तंबूत परतली. शोएब बशीरच्या (Shoaib Bashir) फिरकीसमोर टीम इंडियाचे सुरुवातीचे फलंदाज गडबले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलामीला आलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) 55 धावा करुन बाद झाला. तर रजत पाटीदार आणि सर्फराज खान खातंही खोलू शकले नाहीत. यशस्वी जयस्वलाने 37 धावा केल्या तर रवींद्र जडेजा शोएब बशीरच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि आपली विकेट गमावून बसला. जडेजा 4 धावा करुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. शोएब बशीरने 3 विकेट घेतल्या. टीम इंडियाचा निम्मा संघ गारद झाल्याने सोपं वाटणारं आव्हानही कठिण होऊन बसलं. टीम इंडिया विजयाचं आव्हान गाठणार का असं वाटत असतानाच शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल टीम इंडियासाठी संकटमोचक बनून समोर आले.


या दोघांनी सहाव्या विकेटासाठी 63 धावांची नाबाद पार्टनरशिप केली. शुभमन गिलने नाबाद 52 धावा केल्या, तर ध्रुव जुरेलने नाबाद 39 धावा केल्या. या दोघांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडवर शानदार विजय मिळवला. मालिका विजयाबरोबर टीम इंडिया आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पहिल्या स्थानावर न्यूझीलंड तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. 


इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली
रांची कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पहिल्या डावात इंग्लंडने 353 धावा केल्या. तर भारताची पहिली इनिंग 307 धावांवर आटोपली. युवा ध्रुव जुरेलने तळाच्या फलंदाजांना हातीशी धरत टीम इंडियाला तीनेशे धावांचा टप्पा पार करुन दिला. ध्रुवने 90 धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात इंग्लंडची फलंदाजी आर अश्विन आणि कुलदीप यादवच्या फिरकीसमोर ढेपाळली. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावात आटोपला. 


आर अश्विनने अवघ्या 51 धावात पाच विकेट घेतल्या. अश्विनने तब्बल पाचव्यांदा 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तर कुलदीप यादवने 4 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाच्या वाटेला एक विकेट आली. 


आकाशदीपचा ड्रीम डेब्यू
रांची कसोटीत वेगवान गोलंदाज आकाश दीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणार तो 313 वा खेळाडू ठरला. टीम इंडियाचे प्रमुख कोच राहुल द्रविड यांनी आकाश दीपला टेस्ट कॅप दिली. 27 वर्षांच्या आकाशदीपने पहिल्याच सामन्यात 3 विकेट घेतल्या.