नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. विराटसोबत वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचे नावदेखील या पुरस्कारासाठी सुचवण्यात आलेय. खेलरत्न आणि अर्जून पुरस्कार समितीमधील सूत्रांनी ही विश्वसनीय माहिती दिली. 


गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहलीने भारतीय संघासाठी खोऱ्याने धावा केल्या आहेत. भारतीय आणि परदेशी खेळपट्ट्यांवर विराटने आपले नाणे खणखणीत असल्याचेही सिद्ध केले आहे. याशिवाय, महेंद्रसिंग धोनीनंतर विराटने टीम इंडियाचे यशस्वीपणे नेतृत्त्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळेच विराटची खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आल्याचे समजते.