नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका टीमने 31 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने चांगला खेळ दाखवला पण अनेक महत्त्वाच्या प्रसंगी झालेली चूक त्यांना महागात पडताना दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार म्हणून हा केएल राहुलचा पहिलाच एकदिवसीय सामना होता. त्याच्या नेतृत्वाची सुरुवात या फॉरमॅटमधील पराभवाने झाली. मुख्य म्हणजे तो स्वत:च रन्स करण्यात अपयशी ठरला. त्याने 17 बॉलमध्ये केवळ 12 रन्स केले. 


दरम्यान सामन्यानंतर केएल राहुलने कबूल केलं की, पहिल्या काही ओव्हरर्सध्ये विकेट्स घेतल्यानंतरही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. 'आम्हाला खूप काही शिकायचं आहे. आम्ही चांगली सुरुवात केली, मात्र मधल्या काळात आम्हाला विकेट घेता आल्या नाहीत, असं त्याने सांगितलं.


टीमच्या फलंदाजीबाबत केएल राहुल म्हणाला, "मी 20व्या ओव्हरनंतर फलंदाजी केली नाही त्यामुळे पीच कसं बदललं हे सांगू शकत नाही, पण विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या सांगण्याप्रमाणे, फलंदाजीसाठी ही चांगली विकेट आहे. मधल्या काळात आम्हाला चांगली पार्टनरशिपही करता आली नाही."


भारताला विजयासाठी 297 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. मात्र टीम इंडियाला 50 ओव्हरर्समध्ये 8 विकेट गमावून केवळ 265 धावा करता आल्या. ओपनर शिखर धवनने 84 चेंडूत 79 रन्सची खेळी करत चांगली सुरुवात केली. त्यानंतर विराट कोहलीनेही 52 रन्स केले. यानंतर भारताचा डाव कोसळला, पण शार्दुल ठाकूरने कठीण परिस्थितीत 50 धावा केल्या पण त्या विजयासाठी अपुऱ्या ठरल्या.