मुंबई : पुण्यामध्ये होणाऱ्या चेन्नईच्या आयपीएल मॅचना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएला पुढील आदेश येईपर्यंत पवना धरणातून पाणी घेण्यास मनाई केली आहे. या संदर्भात एमसीएकडून जो करार न्यायालयात आज सादर करण्यात आला . या करारात पवनाचे पाणी एमसीए औद्योगिक वापरासाठी वापरणार असल्याचे म्हटले आहे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा करार चुकीचा असून पवनामधून घेण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर हा स्टेडियमच्या देखभालीसाठी न दाखवता औद्योगिक वापरासाठी दाखवण्यात आला असल्याचे आज मुंबई उच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे यावर निर्णय घेत उच्च न्यायालयाने एमसीए ला पाणी घेण्यास मनाई केली आहे.


चेन्नईचे सामने पुण्यात हलवले


आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमनं दोन वर्षानंतर पुनरागमन केलं. यानंतर चेन्नईत झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये आंदोलन झालं. कावेरीच्या पाणी प्रश्नावरून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियम बाहेर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे टॉस उशीरा पडला. तसंच मॅच सुरु झाल्यावर रवींद्र जाडेजा आणि फाफ ड्यू प्लेसिसवर मैदानात आंदोलनकर्त्यांनी बूटही फेकून मारला होता. या प्रकारानंतर चेन्नईत होणारे सगळे सामने पुण्यामध्ये हलवण्यात आले होते. कावेरीच्या पाणी प्रश्नावर लवादाची नियुक्ती व्हावी यासाठी तामीळनाडूमधले पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. अभिनेते रजनीकांत आणि कमल हसनही या प्रश्नावर रस्त्यावर उतरले होते.