मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकिर्दीमध्ये वादापासून लांब राहिला. २०१३ साली आयपीएलला फिक्सिंगचं ग्रहण लागलं.  मॅच फिक्सिंगप्रकरणी श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन याचा धोनीनं बचाव केल्यामुळे धोनीवर टीका करण्यात आली. धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन.श्रीनिवासन यांच्या नात्यावरही मोठ्या प्रमाणात निशाणा साधण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच फिक्सिंगच्या आरोपाप्रकरणी २०१३नंतर श्रीनिवासन यांची टीम चेन्नई सुपरकिंग्जवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. इंडिया सिमेंट्सचे मालक असलेले श्रीनिवासन तेव्हा चेन्नई सुपरकिंग्जबरोबरच बीसीसीआयची जबाबदारीही सांभाळत होते. यानंतर फिक्सिंगचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि समिती स्थापन करण्यात आली. त्यावेळी धोनी इंडिया सिमेंट्सचा उपाध्यक्षही होता.


फिक्सिंगचा हा वाद सुरु असताना धोनीनं मौन धारण केलं होतं. याप्रकरणावर आता पहिल्यांदाच धोनी बोलला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या बातमीनुसार याप्रकरणातलं धोनीचं मत एका पुस्तकाच्या रुपात समोर आलं आहे. लोक काय म्हणतात, काय विचार करतात यामुळे मला काहीही फरक पडत नाही. श्रीनिवासन हे अशी व्यक्ती आहेत, ज्यांनी नेहमीच क्रिकेटपटूंची मदत केली आहे.


श्रीनिवासन यांनी प्रत्येकवेळी धोनीचं समर्थन केलं आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारताच्या दारुण पराभवानंतर भारतीय टीम व्यवस्थापन धोनीला डच्चू द्यायच्या विचारात होतं, पण श्रीनिवासन यांनी विरोध केला होता. ज्या कर्णधारानं वर्ल्ड कप जिंकून दिला त्याला एवढ्या लवकर डच्चू देणं योग्य नाही, असं मत तेव्हा श्रीनिवासन यांनी मांडलं होतं.