Team india head Coach : भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) समाप्त होणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय नव्या हेड कोचच्या शोधात आहे. बीसीसीआयकडून (BCCI) नव्या प्रमुख प्रशिक्षकासाठी अर्ज मागवण्यात येत असतानाच आता बीसीसीआयने टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सध्याचा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला हेड कोचपदाची ऑफर दिल्याची माहिती समोर येतीये. मात्र, गंभीरने बीसीसीआयसमोर एक अट ठेवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर, स्टीफन फ्लेमिंग यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, आता बीसीसीआयच्या रडारवर गौतम गंभीर असल्याची माहिती समोर येतीये. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, गौतम गंभीर टीम इंडियाच्या हेड कोचपदाची जबाबदारी घेण्यास उत्सुक आहे. परंतू त्याने अर्ज भरण्यापूर्वी बीसीसीआयसमोर एक अट ठेवलीये. गौतम गंभीरला संघ निवडण्याची पूर्ण मुभा हवी आहे आणि त्याने सुचवलेले खेळाडू त्याला हवे आहेत, अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.


बीसीसीआय सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वी पुढील मुख्य प्रशिक्षक परदेशी नसून भारतीय असेल असे संकेत दिले होते. अशा स्थितीत गंभीरबाबत केलेला दावा अधिकच भक्कम झाला. यासाठी गौतम गंभीरला केकेआरचे मेंटर पद सोडावं लागणार आहे. त्यासाठी आता शाहरुख खानला पुढाकार घ्यावा लागेल. शाहरुख खानला गौतम गंभीरला त्याच्या जबाबदारीतून मुक्त करावं लागेल.


गंभीरने 2007 साली भारताने जिंकलेला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलबरोबरच 2011 मध्ये जिंकलेल्या एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. तसेच गंभीरने 2012 आणि 2014 साली दोन वेळा कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिलीये. 


दरम्यान, वनडे क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि टेस्टसाठी अशा वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही. तिन्ही  फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल, जो 3.5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल, असं जय शहा यांनी स्पष्ट केलं होतं. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांना देखील अर्ज करता येणार आहे. त्यासाठी अंतिम तारीख 27 मे असेल, असं जय शहा यांनी म्हटलं होतं.