सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. बिनबाद २४ धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने डावाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या ७२ धावा झाल्या असताना उस्मान ख्वाजा बाद झाला. मात्र, त्यानंतर मार्कस हॅरिस आणि लबुशान यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मार्कस हॅरिसने दमदार फटकेबाजी करत उपहारापर्यंत भारतीय गोलंदाजांना यश मिळून दिले नाही. मात्र, उपहारानंतर अवघ्या दोन धावांची भर काढून तो माघारी परतला. रवींद्र जाडेजाने त्याला ७९ धावांवर त्रिफळाचीच केले. त्यामुळे भारताने सुटकेचा निश्वास टाकला. यानंतर रवींद्र जाडेजाने शॉन मार्शलाही लगेच तंबूत परत धाडले. दुसरीकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद शामी यांनीही प्रभावी मारा केला. दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३६ धावा केल्या आहेत. दरम्यान, चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी संपादन केली आहे.