India T20I series defeat vs WI Hardik Pandya Reacts: भारतीय संघाला वेस्ट इंडीजने टी-20 मालिकेमध्ये पराभूत केलं आहे. भारताला पहिल्यांदाच 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये टी-20 प्रकारात पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाला यजमान संघाने मालिकेतील निर्णयाक सामन्यात 8 विकेट्सने पराभूत केलं. मागील 6 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाचा वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत पराभव झाला आहे. पुढील वर्षी टी-20 चा वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्येच खेळवला जाणार असल्याने हा पराभव भारतीय संघासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. मात्र असं असतानाच भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने मालिका गमावल्यानंतर केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे.


मनाप्रमाणे डावाचा शेवट करता आला नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिका पराभूत झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये हार्दिक पंड्याने, कोणाला काही समजवण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. "मी जेव्हा आलो तेव्हा आम्ही लय गमावली होती. आम्हाला सामन्यातील मोक्याच्या क्षणी परिस्थितीचा फायदा घेता आला नाही. मी मैदानात स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. मात्र मी निराश आहे की मला त्याचा फायदा घेता आला नाही आणि मला मनाप्रमाणे डावाचा शेवट करता आला नाही. माझ्या मते आम्ही स्वत:ला आव्हान देतो. आपण सतत अधिक उत्तम होण्यासाठी प्रयत्न करतो. आम्हाला फार समजवण्याची गरज नाही. मला ठाऊक आहे की संघातील खेळाडू कसे आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ हाताशी आहे," असं पंड्या म्हणाला.


असा पराभव फारसा महत्त्वाचा नसतो


आपण फार प्लॅनिंग करत नाही असंही हार्दिकने यावेळेस स्पष्ट केलं. आपल्याला त्या क्षणी जे योग्य वाटेल ते करतो असंही तो म्हणाला. हार्दिक पंड्याने कधीतरी पराभूत होणं चांगलंही असतं असं म्हटलं आहे. "पराभूत होणं अनेकदा चांगलं असतं. सकारात्मक बाबी पहायच्या जाल्या तर आम्ही बरंच काही शिकलो आहोत. जिंकणे किंवा पराभूत होणे हा या साऱ्या प्रक्रियेचा एक भाग आहे. यामधून आम्ही काहीतरी शिकलो पाहिजे हे महत्त्वाचं आहे. मी फार नियोजन करत नाही. जे माझ्या मनाला योग्य वाटेल ते मी करतो. एक कर्णधार म्हणून मला या मालिकेमध्ये तरुण खेळाडूंनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली याचा फार आनंद आहे," असं हार्दिकने सांगितलं. एखादी मालिका पराभूत झालो आणि त्यामधून शिकायला मिळालं तर हा पराभव फारसा महत्त्वाचा नसतो, अशा अर्थाचं विधानही हार्दिकने केलं. पाचव्या सामन्यामध्ये भारताने दिलेलं 165 धावांचं आव्हान यजमान संघाने 8 गडी आणि 2 ओव्हर बाकी असतानाच गाठलं.



वेस्ट इंडीजच्या दौऱ्यातील कसोटी मालिका आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने जिंकली मात्र टी-20 मालिका गमावली.