कोलकाता : भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात दुसरी टेस्ट मॅच सुरु आहे. भारताची ही पहिलीच डे-नाईट टेस्ट असल्यामुळे या मॅचला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. या टेस्ट मॅचमध्ये भारताच्या बॉलरनी दमदार कामगिरी करत बांगलादेशला पहिल्या इनिंगमध्ये लोळवलं आहे. फक्त १०६ रनवर बांगलादेशची टीम ऑलआऊट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इशांत शर्माने पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक ५ विकेट घेतल्या, तर उमेश यादवला ३ आणि मोहम्मद शमीला २ विकेट मिळाल्या. भारताच्या बॉलरबरोबरच फिल्डरनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आणि ऋद्धीमान सहा यांनी अफलातून कॅच पकडले आहेत.


रोहित शर्माने उमेश यादवच्या बॉलिंगवर बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकचा एका हातात कॅच पकडला. उमेश यादवने टाकलेला बॉल मोमिनुल हकच्या बॅटच्या एजला लागला आणि स्लिपच्या दिशेनं गेला. पहिल्या स्लिपमध्ये विराट आणि दुसऱ्या स्लिपमध्ये रोहित उभा होता. विराटने हा कॅच पकडण्याची तयारीही केली होती, तितक्यात रोहित शर्माने उडी मारून एका हातात कॅच पकडला. 



रोहित शर्मानंतर विकेट कीपर ऋद्धीमान सहानेही जबरदस्त कॅच पकडला. इशांत शर्माच्या बॉलिंगवर महमदुल्लाहच्या बॅटला एज लागून बॉल पहिल्या स्लिपच्या दिशेने जात होता. पण सहाने उडी मारून एका हातात कॅच पकडला.