मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धची तिसरी टी-२० मॅच थोड्याच वेळात सुरु होणार आहे. पहिल्या दोन टी-२० मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर आता तिसरी मॅच जिंकून वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ४ विकेटने आणि दुसऱ्या मॅचमध्ये २२ रननी विजय झाला होता. पहिल्या दोन्ही मॅच अमेरिकेत खेळवण्यात आल्या होत्या, तर तिसरी मॅच प्रोव्हिडेंसमध्ये खेळवली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या टी-२० मॅच जिंकून भारताला अनेक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. भारताने मागच्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० सीरिज ३-०ने जिंकली होती. भारताने आतापर्यंत फक्त तीन टीमनाच (वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका) टी-२०मध्ये व्हाईट वॉश केलं आहे. आता एकाच टीमला दोनवेळा व्हाईट वॉश करण्याची संधी भारताला आहे.


भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ ५ टी-२० मॅचमध्ये विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ एवढे विजय मिळवण्याच्या पाकिस्तानच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. भारत आणि पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ ५ विजय मिळवले आहेत. या मॅचमध्ये विजय मिळवून लागोपाठ ६ विजय मिळवण्याचा विक्रम टीम इंडिया करू शकते.


रोहित शर्माने मागच्या मॅचमध्ये ३ सिक्स मारून आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम केला. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. रोहितने ९६ मॅचच्या ८८ इनिंगमध्ये २४२२ रन केले आहेत. या मॅचमध्ये ७८ रन केले, तर रोहित आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये २,५०० रन करणारा पहिला खेळाडू ठरेल.