कोलंबो : अतिशय रंगतदार लढतीत भारतानं बांग्लादेशचा पराभव करत निदाहास टी-20 तिरंगी मालिका जिंकली. अंतिम सामन्यात भारतानं बांग्लादेशचा 4 गडी राखून पराभव केला. दिनेश कार्तिकनं नाबाद 29 धावांची खेळी करत भारताला विजय साकारुन दिला. 8 चेंडूत 2 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार खेचत दिनेशनं आपल्या संघाला विजय मिळवून दिला.


बांग्लादेशनं भारतासमोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती जावली. शिखर धवन आणि सुरेश रैना झटपट बाद झाले. कर्णधार रोहित शर्मान एक बाजू लावून धरत 56 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, रोहित आणि लोकेश राहुल बाद झाल्यावर टीम इंडियावर पराभवाचं सावट निर्माण झालं होतं. मात्र, दिनेश कार्तिकनं आपल्या स्फोटक खेळीनं भारताला अखेरच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवून दिला. शेवटच्या बॉलला भारताला विजयासाठी ५ रन्सची आवश्यकता असताना कार्तिकनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला.